उंबरट्यासह ओलांडुनिया मातेची माया
नको रे जाउं रामराया
शतनवसांनी येउन पोटीं
सुखविलेंस का दुःखासाठीं?
प्राण मागतो निरोप, रडते कासाविस काया
कशी मूढ ती सवत कैकयी
तीही मजसम अबला आई
आज्ञा देइल का भरता ती कांतारी जाया?
तृप्त होउं दे तिचीं लोचनें
भरत भोगुं दे राज्य सुखाने
वनीं धाडिते तुजसि कशास्तव वैरिण ती वाया?
सांगुं नयें ते आज सांगतें
मजहुन ह्यांना ती आवडते
आजवरी मी कुणां न कथिल्या मूक यातना या
तिच्या नयनिंच्या अंगारांनीं
जळतच जगलें मुला, जीवनीं
तुझिया राज्यीं इच्छित होतें अंतिं तरी छाया
अधर्म सांगू कसा बालका?
तुष्ट ठेव तूं तुझिया जनका
माग अनुज्ञा मात्र जननितें कांतारी न्याया
तुझ्यावांचुनी राहुं कशी मी?
वियोग रामा, साहुं कशी मी?
जमदग्नीसम तात तुझें कां कथिति न माराया
तुझ्या करें दे मरणच मजसी
हो राजा वा हो वनवासी
देहावांचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया
Monday, July 9, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment