Monday, July 9, 2007

थांब सुमंता, थांबवित रे रथ

राम चालले, तो तर सत्पथ
थांब सुमंता, थांबवित रे रथ

थांबा रामा, थांब जानकी
चरणधूळ द्या धरूं मस्तकीं
काय घडें हें आज अकल्पित!

रामराज्य या पुरीं यायचें
स्वप्न लोचनीं अजुन कालचें
अवचित झाले भग्न मनोरथ

गगननील्हे, उष:प्रभा ही
श्रीरघुनंदन, सीतामाई
चवदा वर्षे का अस्तंगत?

चवदा वर्षे छत्र लोपतां
चवदा वर्शे रात्रच आतां
उरेल नगरी का ही मूर्च्छित?

कुठें लपें ती दुष्ट कैकयी?
पहा म्हणावे हीन दशा ही
अनर्थ नच हा, तुझेच चेष्टित

करि भरतातें नृप मातोश्री
रामा मागे निघे जयश्री
आज अयोध्या प्रथम पराजित

पिताहि मूर्च्छित, मूर्च्छित माता
सोदुन रामा, कोठें जातां?
सर्वे न्या तरी नगर निराश्रित

ये अश्रूंचा पट डोळ्यांवर
कोठें रथ तो? केठे रघुवर
गळ्यांत रुतली वाणी कंपित

जेथें राघव तेथें सीता

निरोप कसला माझा घेतां
जेथें राघव तेथें सीता

ज्या मार्गी हे चरण चालती
त्या मार्गी मी त्यांच्या पुढती
वनवासाची मला न भीति
संगे आपण भाग्यविधाता!

संगे असता नाथा, आपण
प्रासादाहुन प्रसन्न कानन
शिळेस म्हणतिल जन सिंहासन
रघुकुलशेखर वरी बैसतां

वनीं श्वापदें, क्रूर निशाचर
भय न तयांसें मजसी तिळभर
पुढती मागें दोन धनुर्धर
चाप त्यां करीं, पाठिस भाता

ज्या चरणांच्या लाभासाठीं
दडलें होतें धरणीपोटी
त्या चरणांचा विरह शेवटीं
काय दिव्य हें मला सांगतां?

कोणासाठीं सदनीं राहूं?
कां विरहाच्या उन्हांत न्हाऊ?
कां भरतावर छत्रे पाहूं?
दास्य करूं कां कारण नसतां?

कां कैकयि वर मिळवा तिसरा?
कां अपुल्याही मनीं मंथरा?
कां छळितां मग वृथा अंतरा?
एकटीस मज कां हो त्यजितां?

विजनवास या आहे दैवीं
ठाउक होते मला शैशवीं
सुखदुःखांकित जन्म मानवी
दुःख सुखावेंप्रीती लाभतां

तोडा आपण; मी न तोडितें
शात जन्मांचे अपुलें नातें
वनवासासी मीही येतें
जाया-पति कां दोन मानितां?

पतीच छाया, पतीच भूषण
पतिचरणांचे अखंड पूजन
हें आर्यांचे नारीजीवन
अंतराय कां त्यांत आणिंता?

रामाविण राज्यपदीं कोण बैसतो

रामाविण राज्यपदीं कोण बैसतो?
घेउनियां खड्ग करीं, मीच पाहतो

श्रीरामा, तूं समर्थ
मोहजालि फससि व्यर्थ
पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो

वरहि नव्हे, वचन नव्हे
कैकीयला राज्य हवें
विषयधुंद राजा तर तिजसि मानतो

वांच्छिति जे पुत्रघात
ते कसले मायतात?
तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो?

लंपट तो विषयिं दंग
तुजसि करी वचनभंग
भायेंचा हट्ट मात्र निमुट पाळितो

वर दिधलें कैकेयीस
आठवले या मितीस
आजवरी नृअपति कधीं बोलला न तो?

मत्त मतंगजापरी
दैव तुझे चाल करो
श्रीरामा, मीच त्यास दोर लावितो

बैस तूंच राज्यपदीं
आड केण येइ मधीं
येउं देत, कंठस्नान त्यास घालितो

येऊं देत तिन्ही लोक
घालिन मी त्यांस धाक
पाहुं देच वृद्ध पिता काय योजितो

शत शतकें पाळ धरा
श्रीरामा, चापधरा,
रक्षणासि पाठीं मी सिद्ध राहतों

येइल त्या करिन सजा
बंधू नच, दास तुझा
मातुःश्री कौसल्येशपथ संगतो

नको रे जाउं रामराया

उंबरट्यासह ओलांडुनिया मातेची माया
नको रे जाउं रामराया

शतनवसांनी येउन पोटीं
सुखविलेंस का दुःखासाठीं?
प्राण मागतो निरोप, रडते कासाविस काया

कशी मूढ ती सवत कैकयी
तीही मजसम अबला आई
आज्ञा देइल का भरता ती कांतारी जाया?

तृप्त होउं दे तिचीं लोचनें
भरत भोगुं दे राज्य सुखाने
वनीं धाडिते तुजसि कशास्तव वैरिण ती वाया?

सांगुं नयें ते आज सांगतें
मजहुन ह्यांना ती आवडते
आजवरी मी कुणां न कथिल्या मूक यातना या

तिच्या नयनिंच्या अंगारांनीं
जळतच जगलें मुला, जीवनीं
तुझिया राज्यीं इच्छित होतें अंतिं तरी छाया

अधर्म सांगू कसा बालका?
तुष्ट ठेव तूं तुझिया जनका
माग अनुज्ञा मात्र जननितें कांतारी न्याया

तुझ्यावांचुनी राहुं कशी मी?
वियोग रामा, साहुं कशी मी?
जमदग्नीसम तात तुझें कां कथिति न माराया

तुझ्या करें दे मरणच मजसी
हो राजा वा हो वनवासी
देहावांचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया

मोडुं नका वचनास

मोडुं नका वचनास-नाथा मोडुं नका वचनास
भरतालागीं द्या सिंहासन, रामासी वनवास

नलगे सांत्वन, नको कळवळा
शब्द दिले ते आधी पाळा
आजोळाहुन परत बोलवा, झणिं माझ्या भरतास

सुतस्नेहानें हौन वेडे
कां घेतां हे आढेवेढे?
वचनभंग का शोभुन दिसतो, रघुवंशज वीरास?

दंडकवनि त्या लढतां शंबर
इंद्रासाठीं घडलें संगर
रथास तुमच्या कुणी घातला, निजबाहूंचा आंस?

नाथ रणीं त्या विजयी झाले
स्मरतें का ते काय बोलले?
"दिधले वर तुज दोन लाडके, सांग आपुली आस"

नरिसुलभ मी चतुरपणानें
अजुन रक्षिलीं अपुलीं वचनें
आज मागतें वर ते दोन्ही, साधुनिया समयास

एक वरानें द्या मज अंदण
भरतासाठीं हें सिंहासन
दुजा वरानें चवदा वर्षे रामाला वनवास

पक्षपात करि प्रेमच तुमचें
उणें अधिक ना यांत व्हायचें
थोर मुखानें दिलेत वर मग, आतां कां निःश्वास?

प्रासांतुन रामा काढा
वा वंशाची रीती मोडा
धन्यताच वा मिळवा, जागुनि निज शब्दांस

खोटी मूर्च्छा, खोटे आंसूं
ऐश्वर्याचा राम पिपासू
तृप्त करावा त्यास हाच कीं आपणांसि हव्यास

व्योम कोसळो, भेंगो शरणी
पुन्हां पुन्हां कां ही मनधरणी?
वर-लाभाविण मी न घ्यायची, शेवटचाहि श्वास

व्हायचे राम अयोध्यापति

आनंद सांगूं किती सखे ग आनंद सांगूं किती
सीतावल्लभ उद्यां व्हायचे राम अयोध्यापति

सिंहासनिं श्रीराघव बसतां
वामांगी तूं बसशिल सीता
जरा गर्विता, जरा लाज्जता
राजभूषणां भूषवील ही, कमनिय तव आकृति

गुरुजन मुनिजन अमीप येतिल
सप्त नद्यांची जलें शिंपतिल
उभय कुळें मग कृतार्थ होतिल
मेघाहुनिही उच्चरवांनीं, झडतिलं गे नौबति

भर्त्यासम तुज जनीं मान्यता
राज्ञीपद गे तुला लाभतां
पुत्राविण तूं होशिल माता
अखील प्रजेच्या मातृपदाची, तुज करणें स्वीकृति
तुझ्याच अंकित होईल धरणी
कन्या होइल मातृस्वामिनी
भाग्य भोगिलें असलें कोणीं?
फळाफुलांनी बहरुनि राहिल, सदा माउली क्षिति

पतीतपावन रामासंगें
पतितपावना तूंही सुभगे
पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे
तिन्ही लोकीं भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति

महाराणि तूं, आम्ही दासी
लीन सारख्या तव चरणंसी
कधीं कोणती आज्ञा देसी
तुझिया चरणीं लीन राहुं दे, सदा आमुची मति

विनोद नच हा, हिच अपेक्षा
तव भाग्याला नुरोत कषा
देवदेवता करोत रक्षा
दृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्याप्रति

आओळखिचे बघ आले पदरव
सांवलींतही दिसते सौष्ठव
तुला भेटण्या येती राघव
बालिश नयनीं तुझ्या येइ कां, लज्जेला जागृति?

Sunday, July 8, 2007

स्वयंवर झालें सीतेचे

आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे

श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
उभे ठाकले भाग्य सांवळे समोर दुहितेचें

मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजीं एकवटुनिया निजशक्ति सारी
फुलूं लागलें फूल हळू हळू गालीं लज्जेचें

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे

हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथापुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे

Saturday, July 7, 2007

आज मी शापमुक्त जाहलें

रामा, चरण तुझे लागले
आज मी शापमुक्त जाहलें

तुझ्या कृपेची शिल्प-सत्कृति
माझी मज ये पुन्हां आकृति
मुक्त जाहले श्वास चूंबिती पावन हीं पाउलें

पुन्हां लोंचनां लाभे दृष्टि
दिसशी मज तू, तुझ्यांत सृष्टि
गोठगोठले अश्रु तापुन गालांवर वाहिले

श्रवणांना ये पुनरपि शक्ति
मनां उमगली अमोल उक्ति
"ऊठ अहल्ये"-असे कुणींस करुणावच बोललें

पुलकित झालें शरिर ओणवें
तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे
चरण्धुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागलें

मौनालागी स्फुरलें भाषण
श्रीरामा, तूं पतीतपावन
तुझ्या दयेनें आज हलाहल अमृतांत नाहलें

पतितपावना श्रीरघुराजा।
काय बांधुं मी तुमची पूजा
पुनर्जात हें जीवन अबघें पायांवर वाहिलें

चला राघवा चला

चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला

मिथिलेहुनिही दर्शनीय नृप
राजर्षीं तो जनक नराधिप
नराधिंपे त्या नगरीमाजीं यज्ञ नवा मांडिला

यज्ञमंडपी सुनाभ कार्मुक
ज्यास पेलता झाला त्र्यंबक
त्र्यंबक देवे त्याच धनूनें त्रिपुरासुर मारिला

शिवधनुतें त्या सदनीं ठेवुन
जनक तयाचें करितो पूजन
पूजनीय त्या विशाल धनुला जगांत नाहीं तुला

देशदेशिंचे नृपती येउन
स्तिमित जाहले धनुष्य पाहुन
पाहतांच तें उचलायाचा मोह तयां जाहला

देव, दैत्य वा सुर, नर, किन्नर
उचलुं न शकले त्यास तसूभर
तसूभरी ना सरलपणा त्या चापाचा वाकला

कोण वाकवुन त्याला ओढिल?
प्रत्यंचा त्या धनूस जोडिल?
सोडिल त्यांतुन बाण असा तर कोणी ना जन्मला

Friday, July 6, 2007

मार ही ताटिका

जोड झणिं कार्मुका
सोड रे सायका
मार ही ताटिका रामचंद्रा

दुष्ट मायाविनी
शापिता यक्षिणी
वर्तनीं दर्शनीं ही अभद्रा

तप्त आरक्त हीं पाहतां लोचनें
करपल्या वल्लरी, करपलीं काननें
अनुलबलगर्विता
मूर्त ही क्रूरता
ये घृणा पाहतां क्रूर मुद्रा

ऐक तें हास्य तूं, दंत, दाढा पहा
मरुन हस्ती जणूं, भरुन गेली गुहा
मृत्यु-छाया जशी
येतसे ही तशी
ओढ दोरी कशी मोड तंद्रा

थबकसी कां असा? हाण रे बाण तो
तूंच मृत्यू हिचा, मी मनीं जाणतो
जो जनां सुखवितो
नारीवध क्षम्य तो
धर्म तुज सांगतो मानवेद्रा!

ज्येष्ठ तुझा पुत्र मला देइ दशरथा

ज्येष्ठ तुझा पुत्र मला देइ दशरथा
यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा

मायावी रात्रीचर
कष्टविति मजसि फार
कैकवार करुन यज्ञ नाहि सांगता

शाप कसा देउं मी?
दीक्षित तो नित्य क्षमी
सोडतोंच तो प्रदेश याग मोडतां

आरंभितां फिरुन यज्ञ
आणिति ते फिरुन विघ्न
प्रकटतात मंडपांत कुंड पेटतां

वेदीवर रक्तमांस
फेंकतात ते नृशंस
नाचतात स्वैंर सुखें मंत्र थांबतां

बालवीर राम तुझा
देवों त्या घोर सजा
सान जरी बाळ तुझा थोर योग्यता

शंकित कां होसि नृपा?
मुनि मागे राजकृपा
बावर्सी काय असा शब्द पाळतां?

सांवळा ग रामचंद्र

सांवळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो
अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो

सांवळा ग रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो
उरलेल्या घासासाठीं थवा राघूंचा थांबतो

सांवळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोंपतो
त्याला पाहतां लाजून चंद्र आभाळीं लोपतो

सांवळा ग रामचंद्र चार भावांत खेळतो
हीरकांच्या मेळाव्यांत नीलमणी उजळतो

सांवळा ग रामचंद्र करी भावंडांसी प्रीत
थोराथोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत

सांवळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन
माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण

सांवळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण
त्याशी करितां संवाद झालों बोबडे आपण

सांवळा ग रामचंद्र करी बोबडे हे घर
वेद म्हणतां विप्रांचे येती बोबडे उच्चार

सांवळा ग रामचंद्र कर पसरुनी धांवतो
रात जागावतो बाई सारा प्रासाद जागतो

सांवळा ग रामचंद्र उद्यां होईल तरुण
मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण

राम जन्मला ग सखी

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती

दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला ग सखी राम जन्मला

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला

राजगृहीं येइ नवी सैख्य-पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनुं अंगणीं
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
‘काय काय’ करत्पुन्हां उमलल्या खुळ्या
उच्चरवे वायु श्वांस हसुंन बोलला

वार्ता ही सुखद जधी पोंचली जनी
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ एक गात चालला

पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणि भूषणें
हास्यानें लोपविले शब्द, भाषणें
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला

दशरथा, घे हें पायसदान

दशरथा, घे हें पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलों हा माझा सन्मान

तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान्‌

श्रीविष्णूंची आशा म्हणुनी
आलों मी हा प्रसाद घेउनि
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान

करांत घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आंतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचें बलवान

राण्या करितिल पायसभक्षण
उदरीं होइल वंशारोपण
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल, योद्धे चार महान

प्रसवतील त्या तीनहि देवी
श्रीविष्णूंचे अंश मानवी
धन्य दशरथा, तुला लाभला, देवपित्याचा मान

कृतार्थ दिसती तुझीं लोचनें
कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें
दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञीं अंतर्धान

उदास कां तूं?

उदास कां तूं? आवर वेडे, नयनांतिल पाणी लाडले कौसल्ये राणी

वसंत आला, तरूतरूवर आली नव पालवी
मनांत माझ्या उमलुन आली तशीच आशा नवी
कानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी

ती वाणी मज म्हणे, "दशरथा, अश्वमेघ तूं करी
चार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरीं."
विचार माझा मला जागवो, आलें हें ध्यानीं

निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली-
"वसिष्ठ, काश्यप, जाबालींना घेउन ये या स्थलीं.
इष्ट काय तें मला सांगतिल गुरुजन ते ज्ञानी"

आले गुरुजन, मनांतलें मी सारें त्यां कथिलें
मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीनें मथिलें
नवनीतासम तोंच बोलले स्निग्धमधुर कोणी

"तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे", मनोदेवतो वदे,
"याच मुहूर्ती सोड अश्व तूं, सत्वर तो जाउं दे"
"मान्य"-म्हणालो-"गुर्वाज्ञा" मी, कर जुळले दोन्ही

अंग देशिंचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतो स्वतः
त्याच्या करवीं करणें आहे इष्टीसह सांगता
धूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनी

सर्यूतीरीं यज्ञ करूं गे, मुक्त करांनी दान करूं
शेवटचा हा यत्न करूं गे, अंती अवभृत स्नाना करूं
ईप्सित तें तो देइल अग्नी, अनंत हातांनीं

उगा कां काळिज माझें उले?

उगा कां काळिज माझें उले?
पाहुनी वेलीवरचीं फुलें

कधीं नव्हे तें मळलें अंतर
कधीं न शिवला सवतीमत्सर
आज कां लतिकावैभव सले?

काय मना हे भलतें धाडस?
तुला नावडे हरिणी-पाडस
पापणी वृथा भिजे कां जले?

गोवत्सांतिल पाहुन भावां
काय वाटतो तुजसी हेवा?
चिडे कां मौन तरी आंतलें?

कुणी पक्षिणी पिलां भरविते
दृश्य तुला तें व्याकुळ करितें
काय हें विपरित रे जाहलें?

स्वतःस्वतःशीं कशास चोरी?
वात्सल्याविण अपूर्ण नारी
कळालें सार्थक जन्मांतलें

सरयू-तीरावरी

सरयू-तीरावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तु सुंदर
मधुन वाह्ती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी

घराघरावर रत्नतोरणें
अवती भंवती रम्य उपवनें
त्यांत रंगती नृत्य गायनें
मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी

स्त्रिया पतिव्रता, पुरुषहि धार्मिक
पुत्र उपजती निजकुल-दीपक
नृशंस ना कुणि, कुणि ना नास्तिक
अतृप्तीचा कुठें न वावर, नगरिं, घरीं,अंतरीं

इक्ष्वाकु-कुल कीतीं भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचें करितो रक्षण
गृहीं चंद्रसा, बगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी

१. कुश लव रामायण गाती

स्वयें श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रूपें आकारती

ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत-वैभव-गाते कोकिल
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराज भारिती

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभुषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती

Sunday, May 13, 2007

२७ कोण तूं कुठला राजकुमार ?

२७

"मागणें हें एक रामा, आपुल्या द्या पादुका"

-- भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेलें हे दान श्रीराम नाकारूं शकले नाहींत. श्रीरामांच्या चरणधुळीनें पावन झालेल्या त्या सुवर्णमंडित पादुका भरताने हत्तीवरून मिरवीत मिरवीत अयोध्येस नेल्या. त्या पादुकांनाच त्याने राज्याभिषेक करविला आणि स्वत: राज्यकारभार पाहूं लागला.

इकडे श्रीरामांनी चित्रकूट सोडला. प्रवास करीत ते दक्षिणेस निघाले. वाटेंत उभयतां भावांनी विराध नामक राक्षसाचा वध केला. शरभंगाश्रमीं जाऊन त्या स्वर्लोकगामी महात्म्याचें दर्शन घेतलें. शरभंगाश्रमींच कांही ऋषिजनांनी श्रीरामांना नम्र विनंति केली, "आश्रमवासी ऋषिजनांचा राक्षसांकडून अनन्वित छळ होतो आहे. आपण समर्थ आहांत, राजे, आहांत ; धार्मिकांचें रक्षण करा." यावर सर्वज्ञ राम विनयाने आणि निश्चयाने बोलले, " तपस्वीजनांचे चिरशत्रु राक्षस यांचा नायनाट करण्याची माझी इच्छा आहे. आपण निश्चिंत असावें."
ऋषींना अभय-वचन देऊन श्रीराम पुढे संचार करू लागले. सुतीक्ष्णाश्रम पंचाप्सर सरोवर या भागांत त्यांनी दहा वर्षें आनंदाने संचार केला. नंतर सुतीक्ष्णाच्या आज्ञेवरून त्यांनीं अगस्त्याश्रमाचा मार्ग धरला. सुतीक्ष्ण आणि अगस्ति या महर्षीनीं राम-लक्ष्मणांना दिव्यायुधें अर्पण केलीं.

दहा वर्षानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटींत आले. त्या मनोहर वनप्रदेशांत त्यांची कुटि अत्यंत शोभून दिसूं लागली.


एकदां याच पर्णशालेच्या ओट्यावर श्रीराम जानकी-लक्ष्मणासह वार्ताविनोद करीत असतांना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणांत आली. अनुरक्तेसारखे अंगविक्षेप करीत, धुंद डोळ्यांनीं ती श्रीरामाला न्याहाळूं लागली. हलकें हलकें मंजुळ स्वर काढून ती श्रीरामाशीं बोलूं लागली. ती म्हणाली ---

शूर्पणखा :

कोण तूं कुठला राजकुमार ?
देह वाहिला तुला शामला, कर माझा स्वीकार ॥धृ.॥

तुझ्या स्वरूपीं राजलक्षणें
रुद्राक्षांचीं श्रवणिं भूषणें
योगी म्हणुं तर तुझ्या भोंवती वावरतो परिवार ॥१॥

काय कारणें वनिं या येसी ?
असा विनोदें काय हांससी ?
ज्ञात नाहिं का ? येथ आमुचा अनिर्बंध अधिकार ॥२॥

शूर्पणखा मी रावणभगिनी
याच वनाची समज स्वामिनी
अगणित रूपें घेउन करितें वनोवनीं संचार ॥३॥

तुझ्यासाठिं मी झालें तरूणी
षोडषवर्षा मधुरभाषिणी
तुला पाहतां मनांत मन्मथ जागुन दे हुंकार ॥४॥

तव अधराची लालस कांती
पिऊं वाटते मज एकांतीं
स्मरतां स्मर का अवतरसीं तूं अनंग तो साकार ? ।।५॥

मला न ठावा राजा दशरथ
मनांत भरला त्याचा परि सुत
प्राणनाथ हो माझा रामा, करु सौख्यें संसार ॥६॥

तुला न शोभे ही अर्धांगी
दूर लोट ती कुरुप कृशांगी
समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणिं करितें संहार ॥७॥

माझ्यासंगे राहुनि अविरत
पाळ तुझें तूं एकपत्निव्रत
अलिंगनाची आस उफाळे तनूमनीं अनिवार ॥८॥

२६ तात गेलें, माय गेली, भरत आतां पोरका

२६
"दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा"

- हें श्रीरामांनी कितीहि वेळा पटवून सांगितलें तरी भरताचे डोळे कोरडे होईनात. तो पुन्हां पुन्हां श्रीरामांना आग्रह करीत होता, "तुम्ही परत चला. राज्याभिषेक करवून घ्या."

भरताप्रमाणेंच, भरताबरोबर आलेल्या ऋषिजनांनी पुष्कळ आग्रह केला. पण श्रीरामांनी नम्रपणें नकारच दिला.

ते म्हणाले, "भरता पित्राज्ञेने मला वनवास आणि तुला सिंहासन मिळाले आहे. तूं परत जा आणि अयोध्येचें राज्य कर. हेंच धर्म्य आणि उचित आहे. पित्राज्ञेप्रमाणें चवदा वर्षे वनवास भोगून मी सीता-लक्ष्मणासह अयोध्य येईन".

श्रीरामांच्या या उत्तराने निराश झालेला भरत गहिंवरला आणि श्रीरामांच्या पादुकांना स्पर्श करून करूणार्द्र स्वरांनीं म्हणाला ----
तात गेलें, माय गेली, भरत आतां पोरका
मागणें हें एक रामा, आपुल्या द्या पादुका ॥धृ.॥

वैनतेयाची भरारी काय मशकां साधते ?
कां गजाचा भार कोणीं अश्वपृष्ठीं लादतें ?
राज्य करणें राघवाचें अज्ञ भरता शक्य का? ॥१॥


वंशरीतीं हेच सांगे -- थोर तो सिंहासनीं
सान तो सिंहासनीं कां, जेष्ठ ऐसा काननीं ?
दान देतां राज्य कैसें या पदांच्या सेवका ? ॥२॥

घेतला मी वेष मुनिचा सोडतांना देश तो
कैकयीसा घेउं माथीं का प्रजेचा रोष तो ?
काय आज्ञा आगळी ही तुम्हिच देतां बालका ? ॥३॥

पादुका या स्थापितों मी दशरथांच्या आसनीं
याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनीं
चरणचिन्हें पूजुनीं हीं साधितों मी सार्थका ॥४॥

राम नाहीं, चरणचिन्हें राहुं द्या हीं मंदिरीं
नगरसीमा सोडुनी मी राहतों कोठें तरी
भास्कराच्या किरणरेखा सांध्यकाळीं दीपिका ॥५॥

चालवीतों राज्य रामा, दुरुन तुम्ही येइतों
मोजितों संवत्सरें मी, वाट तुमची पाहतों
नांदतों राज्यांत, तीर्थी कमलपत्रासारखा ॥६॥

सांगता तेव्हां न आले, चरण जर का मागुती
त्या क्षणीं या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती
ही प्रतिज्ञा, ही कपाळीं पाउलांची मृत्तिका ॥७॥

२५ दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा

२५

"चापबाण घ्या करीं सावधान राघवा ----"

--- असा इशारा श्रीरामचंद्रांना देणारा लक्ष्मण स्वत: भरतावर संतापाने धावून जाऊं लागला तेव्हां श्रीरामांनी परत त्याचें सांत्वन केलें. भरत रामाश्रमांत आला. वेड्यासारखीच त्याने श्रीरामांच्या चरणांना मिठी घातली. रामांनी त्याला लवळ घेतला. कुशल प्रश्न विचारले. भांबावून गेलेल्या भरताने मोठ्या कष्टाने पितृनिधनाची वार्ता सांगितली. सर्व आश्रमावरच दु:खाची छाया पसरली. यथाकाळीं श्रीरामांनी वडिलांचे श्राद्ध केलें. भरत पुन्हां पुन्हां म्हणूं लागला, "रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळें आणि वडिलांच्या पत्नीप्रेमामुळें तुम्हाला वनवासी व्हावें लागलें. तेंव्हां सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले ---

दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ॥धृ.॥

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग, काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा ॥१॥

अंत उन्नतीचा पतनीं होइ यां जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा ॥२॥

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसें भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ? ॥३॥

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें कांही, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा ॥४॥

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा ॥५॥

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हां नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा ॥६॥

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा ॥७॥

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळुन दोघे होउं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा ? ॥८॥

संपल्याविना हीं वर्षे दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा ॥९॥

पुन्हा नका येऊं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझा जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा ॥१०॥