Sunday, May 13, 2007

२६ तात गेलें, माय गेली, भरत आतां पोरका

२६
"दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा"

- हें श्रीरामांनी कितीहि वेळा पटवून सांगितलें तरी भरताचे डोळे कोरडे होईनात. तो पुन्हां पुन्हां श्रीरामांना आग्रह करीत होता, "तुम्ही परत चला. राज्याभिषेक करवून घ्या."

भरताप्रमाणेंच, भरताबरोबर आलेल्या ऋषिजनांनी पुष्कळ आग्रह केला. पण श्रीरामांनी नम्रपणें नकारच दिला.

ते म्हणाले, "भरता पित्राज्ञेने मला वनवास आणि तुला सिंहासन मिळाले आहे. तूं परत जा आणि अयोध्येचें राज्य कर. हेंच धर्म्य आणि उचित आहे. पित्राज्ञेप्रमाणें चवदा वर्षे वनवास भोगून मी सीता-लक्ष्मणासह अयोध्य येईन".

श्रीरामांच्या या उत्तराने निराश झालेला भरत गहिंवरला आणि श्रीरामांच्या पादुकांना स्पर्श करून करूणार्द्र स्वरांनीं म्हणाला ----
तात गेलें, माय गेली, भरत आतां पोरका
मागणें हें एक रामा, आपुल्या द्या पादुका ॥धृ.॥

वैनतेयाची भरारी काय मशकां साधते ?
कां गजाचा भार कोणीं अश्वपृष्ठीं लादतें ?
राज्य करणें राघवाचें अज्ञ भरता शक्य का? ॥१॥


वंशरीतीं हेच सांगे -- थोर तो सिंहासनीं
सान तो सिंहासनीं कां, जेष्ठ ऐसा काननीं ?
दान देतां राज्य कैसें या पदांच्या सेवका ? ॥२॥

घेतला मी वेष मुनिचा सोडतांना देश तो
कैकयीसा घेउं माथीं का प्रजेचा रोष तो ?
काय आज्ञा आगळी ही तुम्हिच देतां बालका ? ॥३॥

पादुका या स्थापितों मी दशरथांच्या आसनीं
याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनीं
चरणचिन्हें पूजुनीं हीं साधितों मी सार्थका ॥४॥

राम नाहीं, चरणचिन्हें राहुं द्या हीं मंदिरीं
नगरसीमा सोडुनी मी राहतों कोठें तरी
भास्कराच्या किरणरेखा सांध्यकाळीं दीपिका ॥५॥

चालवीतों राज्य रामा, दुरुन तुम्ही येइतों
मोजितों संवत्सरें मी, वाट तुमची पाहतों
नांदतों राज्यांत, तीर्थी कमलपत्रासारखा ॥६॥

सांगता तेव्हां न आले, चरण जर का मागुती
त्या क्षणीं या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती
ही प्रतिज्ञा, ही कपाळीं पाउलांची मृत्तिका ॥७॥

No comments: