Sunday, May 13, 2007

२५ दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा

२५

"चापबाण घ्या करीं सावधान राघवा ----"

--- असा इशारा श्रीरामचंद्रांना देणारा लक्ष्मण स्वत: भरतावर संतापाने धावून जाऊं लागला तेव्हां श्रीरामांनी परत त्याचें सांत्वन केलें. भरत रामाश्रमांत आला. वेड्यासारखीच त्याने श्रीरामांच्या चरणांना मिठी घातली. रामांनी त्याला लवळ घेतला. कुशल प्रश्न विचारले. भांबावून गेलेल्या भरताने मोठ्या कष्टाने पितृनिधनाची वार्ता सांगितली. सर्व आश्रमावरच दु:खाची छाया पसरली. यथाकाळीं श्रीरामांनी वडिलांचे श्राद्ध केलें. भरत पुन्हां पुन्हां म्हणूं लागला, "रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळें आणि वडिलांच्या पत्नीप्रेमामुळें तुम्हाला वनवासी व्हावें लागलें. तेंव्हां सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले ---

दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ॥धृ.॥

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग, काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा ॥१॥

अंत उन्नतीचा पतनीं होइ यां जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा ॥२॥

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसें भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ? ॥३॥

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें कांही, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा ॥४॥

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा ॥५॥

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हां नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा ॥६॥

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा ॥७॥

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळुन दोघे होउं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा ? ॥८॥

संपल्याविना हीं वर्षे दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा ॥९॥

पुन्हा नका येऊं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझा जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा ॥१०॥

No comments: